सगळीकडे प्रश्न भरून राहिलेत

सगळीकडे प्रश्न भरून राहिलेत
गावात नेट येत नाही
झाडावर चढून अंदाज घेतायेत चांगल्या नेटवर्कचा
पोर खोळंबून राहिलीयत
परीक्षा, प्रवेश, शिकणे, आणि मोकळा श्वास
वसतिगृहे ओस पडलीयेत
विषाणू घुसून राहिलाय सगळीकडे
बंद वर्गाकडे नजर घुसवून
सताठ पोरांच्या ऑनलाईन हजेरीत
पोरांचं भविष्य शोधतोय उद्यासाठी मास्तर
अढकळलेल्या नेटच्या प्रतिक्षेत
ओपन केलेली प्रवेशाची लिंक कोरडी पडलेय पैश्यावाचून
पूर्ण करता करता बापाचा अर्धपोटी लोकडॉउन
उभा ठाकतोय समोर
सगळीकडे बंद दरवाजे जगण्याचे
झूम यूट्यूब मीट सगळे हात पसरून बसूनही
कुठेही स्थिर नसणारे शिक्षण
आणि सभोतलाचा शैक्षणिक गोंधळ
दुकान बंद पडल्याने
बाप चितागत झालाय
कोठेही काम करायची तयारी असूनही
पोट भरता येत नाही
कष्टाची तयारी असूनही
हात मोकळेच पडलेत
या विषाणूच्या आगमनाने
आयुष्याची पडझड चालुय
हरवत चाललेली माणसातील
माणुसकी आणखी गढद झालीय
घरात कामावर शेजारी अवतीभोवती,
आपल्याच माणसापासून बाजूला धावणारी व्यवस्था
आणखी जोराने मूळ धरू लागलीय
जगण्याच्या गदारोळात कष्टकरी
हरवत चाललाय आपल्याच जगण्याची ऊब
एक विषाणू आणि त्याआधारे होणाऱ्या
माणुसकीच्या होळी
माणसाला माणसाने असल्या काळात जे करायला हवे
ते पहानेच होतेय दूर
समोर मात्र माणसाची समाजाची आणि पोटाची
लुटालूट सर्रास

लॉकडाऊन

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून
मोठमोठया अभ्यासक व इतर लोकांची चुफी रिपोर्टर्स सुरू झालीयेत
प्रत्येक जण आपल्या परीने आपल्या बांधिलकीने आपल्या चौकटीच्या आतच
बाहेर पडणाऱ्या पोटाच्या तुकड्यासाठी
प्रदेशावर आलेल्या व जगण्याच्या तळमळीने धावणारे माणसांचे लोंढे
यांचे घनगंभीर अवलोकन
आपल्या घनदाट भाषाशैलीत माल मसाला लावून रिपोर्टिंग करतोय
कोरडे दुःख, कोरडी भावना प्रत्येकाच्या भावनेत ओथंबलेला कोरडेपणा
वाफाळलेल्या कॉफीचा कप टेबलावरती ठेवून टेलिव्हिजन वर दिसणाऱ्या
स्वतःच्या बचावासाठी धावणाऱ्या मजुरांचे लोंढे पाहत
त्यांच्या दुखर्‍या जखमेवरील पापुद्रे सोलतायेत रिपोर्टर

लिहिन्यातून

जाळे लावून बसलेली माणसं
पकडत राहतात निरपराध माणसांना
स्वार्थाच्या हव्यासाने
जपत जपत जगणाऱ्याची
घुसमट सिगेल पोचती
ही जळमटे वाढत जातात जगण्याचा ताळमेळात
स्वच्छ निर्भर जगणे
कोलमडून जाते
भ्रमनिरास अवघे आकाश
या कोलाहलात

सोशल मिडीया वाचक व अभिरुची


मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच ठिकाणी ऐकावयास मिळते. माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन केल्याने ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. हे लक्षात घेतले तरच वाचन संस्कृती वाढावयास मदत होईल. टीव्हीचा वाढता प्रभाव, सोशल मीडिया साइट्स, इंटरनेट, या माध्यमामुळे तरुणाईबद्दल वाचनाविषयी फारच काळजीचे वातावरण आहे. आता तर इंटरनेटचा वापर मोबाइलसारख्या सोप्या माध्यमाद्वारे करू लागले आहेत. इंटेरनेटच्या पाठीवरून आलेल्या व त्यांनी दिलेल्या व्यक्त व्हायची संधीतून सोशल नेटवर्किंग वाढत गेले. जगाच्या कानाकोपऱ्यातील मंडळी एकमेकांशी संवाद साधू लागली. वेगवेगळ्या आवडी, छंद आणि इतर औत्सुकतेच्या विषयांनुरूप हे ग्रुप,गट वाढत जात आहेत.
तंत्रज्ञानाची क्रांती
एकविसाव्या शतकात जन्मलेल्या जवळपास प्रत्येकाला मोबाइल तंत्रज्ञानासोबत इंटरनेट उपलब्ध असणे ही फारच क्रांतिकारक सोय निर्माण झाली आहे. प्रत्येक मोबाइलधारक हा शब्दशः महाभारतातील संजयाइतका पारंगत होत आहे. “इंटरनेट आणि ‘ई-बुक’ यांनी आज वाचनालयांची जागा घेतलेली दिसते. विविध विषयांमधील पुस्तके ऑनलाईन साईट्समुळे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत आहे. तरुणाई फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा किंडलवर वाचते. या वाचकांची संख्या वाढलेली दिसते.”१ सर्व मोबाईल धारक या नव्या सोशल मिडीयाचा वापर करताना दिसतो. या माध्यमातून अनेक लोकांचे विचार मते केलेल्या कॉमेंट याचे वाचन करताना दिसतो. पुस्तकातील वाचनाची जागा हळूहळू माध्यमातील सोशल साईट घेतात की काय असे चिन्ह आसपास दिसते आहे. या माध्यमावर लिहिणारे हे विविध स्तरांतले व्यक्ती आहेत. लेखेकच या माध्यमावर लिहिणारे असतीलच असे नसून लहानापासून मोठ्याव्यक्ती फेसबुक, व्हॉट्सअॅप माध्यमात लिहताना दिसतात. या माध्यमात दादही थेट व लगेच मिळते. अट्टल वाचणारे मात्र मुद्रित पुस्तके वाचणे सोडत नाहीत. आजच्या तरुणाईला अनुवाद वाचायला आवडतात. त्यातून मराठी माध्यमातून शिकलेल्या पिढीला इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी अनुवाद म्हणजे जगाची उघडलेली खिडकी वाटते. माध्यमातून लेखक वैचारिक, चटपटीत, सोपे लिहितात, ते तरुणाईला आवडते. सोशल मीडियामुळे समाजातले बरेच भेद नष्ट झाले. हे सपाटीकरण लेखनाच्या बाबतीत आनंददाई आहे.
या पिढीला तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्याधुनिक संवाद साधने उपलब्ध झाली आहेत. माध्यमे बदलली, तरी ही पिढी वाचत आहे. त्या त्या काळातील माध्यमावर तरुण स्वार होत असतात. आजच्या आयटीमधील तरुणांना फँटसीची ओढ आहे. कविता, कथा, वैचारिक, सामाजिक प्रश्न व अनुवादित साहित्याकडेही त्यांचा कल दिसून येतो. अनेक तरुण धाडसाने आपले म्हणणे मांडताना दिसतात. या लेखणात जोरकसपणा दिसून येतो. आजची पिढी सकस लिहिते आणि तेच तिचे सामर्थ्य आहे. त्यांची भाषा संकरीत आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील व व्यवसायातील अनेक लिहिते साहित्यिक नेटवर वाचत वाचतच त्यांचा परिचय होऊन ओळख वाढते. हे सर्वजण लक्षणीय अनेक फॉर्म्समध्ये लिहीत आहेत. एकूणच साहित्याची त्यांची जाण प्रगल्भ आहे.
फेसबुकवरील वाचक व लेखक
फेसबुक कवितांसाठीही एक उत्कृष्ट व्यासपीठ झाले आहे लेखक, प्राध्यापक, इंजिनियर, अशा अनेक साहित्याची आवड असणाऱ्या लोकांचे साहित्य परिचय समाजिक प्रश्न, चालू घडामोडी फेसबुकच्या माध्यमातून लिहताना दिसतात.फेसबुकच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण कवितांचे लेखन व त्या संबंधी कवितेचे आस्वादन ही होताना दिसते. कवी अजय कांडर, प्रवीण बांदेकर, बाळासाहेब लबडे, पांडुरंग सुतार, विनोद कुलकर्णी, लवकुमार मुळे, भाऊसाहेब मिस्त्री, डि.के. शेख, सुनील पाटील, रेणुका खोत, ऐश्वर्य पाटेकर, संतोष पद्माकर, अशोक कोतवाल, हरीभाऊ हिरडे, खलील मौमीन,सुशील शिंदे अशा अनेक दर्जेदार कवींच्या कविता फेसबुकच्या माध्यमातून वाचक वाचताना दितात. व या कविताना भरभरून दाद देताना दिसतात या सोबतच या कवितेतील भल्या बुऱ्या गोष्टींची चर्चाही होताना दिसते. याबरोबरच कादंबरी क्षेत्रातील नामवंत “आनंद विंगकर, कविता महाजन , प्रवीण बांदेकर, रंगनाथ पठारे, मकरंद साठे, राजन खान, कैलास दौंड, बाबुराव मुसळे, ऋषिकेश गुप्ते, संजय भास्कर जोशी, वर्जेश सोळंकी, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, प्रमोद कोपर्डे, लक्ष्मीकांत देशमुख, अरुण शेवते, किशोर पाठक, राजीव तांबे, यशवंत मनोहर, श्रीकांत देशमुख”६ अशा कादंबरीच्या जाणकारांची ही वैचारिक देवान-घेवाण फेसबुकच्या माध्यमातून होत असते.
अशा या कादंबरीकारांच्या सोबतच सतीश वाघमारे, अरुण शिंदे, पृथ्वीराज तौर, सतीश तांबे, बालाजी सुतार, सतीश वाघमारे , तारा भवाळकर, देवानंद सोनटक्के इत्यादी लेखक फेसबूकच्या माध्यमातून आपले वैचारिक लेखन करताना दिसतात. यासोबतच चं. प्र. देशपांडे, हिमांशू स्मार्त, मकरंद साठे असे आजच्या पिढीतील नाटककार आपली मते फेसबुकच्या माध्यमातून मांडताना दिसतात. या सोबतच अमोल उदगीकर,समीर गायकवाड,किरण माने आपली चित्रपट समीक्षा करताना दिसतात. या सर्व साहित्यीकाच्या मतांचा या विचारासी सहमत असहमत असाही विचार होताना दिसतो.
व्हाटसॲपवरील वाचक व लेखक
व्हाटसॲप वरील समूहामुळे, अनेक प्रकारच्या गटांची, ग्रुपची निर्मिती झाली आहे. शिक्षक, वकील, इंजिनिअर, कामगार, उद्योजक, दुकानदार, अश्या विविध प्रांतातील लोकांनी व्हाटसॲप ग्रुप गट तयार केले गेले आहेत. वाचनाच्या अंगाने त्याकडे पहिले तर यावरील काही ग्रुपचे सोडले तर काही निर्माण झालेल्या ग्रुपवर अभ्यास-चिंतनपूर्ण लेखनाचा परिचय होताना दिसतो. “अभिरुची, मराठी प्राध्यापक, शिविम, सा.फु. मराठी विभाग”५ अश्या अनेक ग्रुप मध्ये साहित्यविषयक नव्या जुन्या साहित्याचा गंभीरपणे विचार होताना दिसतात.
कविता, कथा, ललित, अश्या समान अभिरुचीच्या लोकांनी एकत्र येऊन व्हाटसॲप माध्यमातून ग्रुपची स्थापनाही केली गेलेली दिसते. पृथ्वीराज तौर, रणधीर शिंदे, अरुण शिंदे, नंदकुमार मोरे, प्रभाकर देसाई, उदय रोटे, गजानन अपीने, प्रवीण बांदेकर यांच्यासारख्या समकालीन महत्वाचे लिहिते लेखक स्तंभ-ब्लॉग-वर लिहिताना दिसतात. तर बाळासाहेब लबडे, सुनील पाटील, संतोष पद्माकर, खलील मौमीन यासारख्या कवी लेखकाकडून प्रचलित आणि त्यांनी स्वत:च जुन्या व नवीनही लिहिलेली विचारप्रवण कविता व्हाटसॲप ग्रुपवर वाचायला मिळते आहे. व वाचक त्याना दाद देताना दिसतात. अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने चालवलेल्या या-ग्रूपमध्ये अनेक थीम्स घेऊन गंभीर साहित्यिक चर्चा होत असतात त्यांमध्ये जाणकार वाचक सहभागी होताना दिसतात.
या साहित्यिक वाचनात खूप लोकांची यादी करता येईल. माझ्या आवतीभोवतीची ग्रुपवरील व फेसबुक वरील इतकी नावं आलीत. कित्येक राहिली ही. यातले कोण कुठे ,कोण कुठे. देशभरात, जगभरात. सोशल मीडियाने भावविश्व आणि साहित्यविश्वही आज व्यापलेलं आहे. यातून कवितेला किती नव्या मिती मिळाल्या, किती विचारांचं आदानप्रदान होत आहे. हे प्रश्नही समोर येतात. कधी वैचारिक शीणही येतो. वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी जिज्ञासू वाचक सोशल मिडीयाचा वापर वा नव्या सकस लिहणाऱ्या लेखकाना आपल्याशी जोडून घेताना दिसतात व या जोडून घेण्यातून वाचनाची भूक व जीज्ञासा भागवताना दिसतात.
“संस्कृती (राजेंद्र थोरात), साहित्य आणि समाज (प्रशांत देशमुख), माय मराठी (शे. दे. पसारकर), बालमित्र (प्रशांत गौतम), , काव्यचावडी (भगवान निळे, कल्पेश महाजन, योगिनी राऊळ), साहित्य संगिती (कपूर वासनिक), झिमाड (वृषाली विनायक), खान्देश साहित्य मंच(नामदेव कोळी), टीका आणि टीकाकार (गणेश मोहिते), सत्यशोधक (वंदना महाजन), अक्षरवाङ्मय (नानासाहेब सूर्यवंशी), पुरोगामी (हनुमान बोबडे, गजानन वाघ), जय साहित्य प्रतिष्ठान(जय घाटनांद्रेकर), शब्दसह्याद्री (बाळू बुधवंत)”२ अशा निखळ वाङ्मयीन गटातून साहित्यिक वाचणाची आवड निर्माण करत आहेत.
या माध्यमाबरोबर इंटरनेटवर ई मासिके मिळणेही सुलभ झाले आहे.विविध सीमकार्ड कपन्यांनी आपल्या ॲपव्दारे मासिके वाचनासाठी उपलब्ध केली आहेत. जिओ, ॲपवर हजारो मासिके उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील साधना, अनुभव, किशोर अशी दर्जेदार मासिकेही वाचक वाचताना दिसतात. मराठी साहित्य प्रेमींसाठी सद्यकाळात ई संमेलन ही ठीक ठिकाणी होताना दिसतात. युनिक फिचर ने आत्तापर्यंत ४ते५ ई संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाना वाचकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळताना दिसतो.
डिजिटल माध्यमे व वाचक अभिरुची
लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय होय. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय असे. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. ई-बुक ही वाचनातील सहज साध्य व हवे ते पुस्तक तत्काळ मिळवून देणारे महत्वाचे माध्यम होय. जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. वाचनाची बदलती माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेत आहेत. छापील माध्यमांचा डिजिटल माध्यमांच्या दिशेने प्रवास सुरू आहे. येणारे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे काळानुसार बदलणाऱ्या या वाचन माध्यमांना आपण स्वीकारताना दिसतो. आपल्या वेळेनुसार वाचक सद्या आपल्याला हवे ते पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र, नियतकालिक डाउनलोड वा तत्काळ वाचताना दिसतो. लेखकांपर्यंत पोहोचणे, संपर्क साधणे आता अधिक जलदसोपं झालं आहे. लेखक वाचक ह्यांच्यात होणाऱ्या संवादातून लेखक वाचक परस्परांतले अंतर सूक्ष्म झाले आहे.
हे सर्व वाचनाचे प्रयोग पाहतां आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो. समाजमाध्यमांनी काय केले? तर केवळ प्रकाशन माध्यमाचीच नव्हे तर अभिव्यक्तीची दारे सर्व जनांना खुली केली आहेत. नवोदित लेखकांचा वाचकांशी संपर्क होतो. लेखक आणि वाचकाचं नातं जुळून येते. त्या दोघांनाही लिखाणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीबाबत चौकश्या नसतात. काही घेणेदेणे नसते. मात्र लिखाण वाचल्यावर त्याशी आपलं जग किती जवळून जोडल्यासारखं वाटते. कवी लेखकांची संख्या फेसबुक, व्हाटसॲप आणि इतर समाजमाध्यमांमुळे वाढली आहे.डॉ. पृथ्वीराज तौर व्हॉट्सअॅप साहित्य समेलन अध्यक्षपदी भाषणात म्हणतात “समाजमाध्यम आज नवे लेखक घडवत आहे आणि त्याचवेळी हे लेखक समाजमाध्यमांची आचारसंहिताही घडवत जात आहेत. स्वतःला विकसित करणे, जाणीवा समृद्ध करणे, समानधर्मी मित्र मिळवणे, आपल्या लेखनासाठी अपेक्षित स्पेस आणि वाचक निवडणे अशा अनेक गोष्टी समाजमाध्यमांमुळे शक्य झाल्या आहेत. समाजमाध्यमांनी जगाची दारे खुली केली आहेत.”३ व्हाटसॲप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमातील आपले लेखन अगदी असेच आहे. सदसदविवेकाचा वापर करुनच ते झाले पाहिजे, कारण त्यावरुनच तुमचे मुल्यमापन होणार आहे.
समारोप
असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे दोन व्यक्तींमधल्या संवादातील सहजता वाढविण्यासाठी तयार झालेले माहिती तंत्रज्ञान ह्या पिढीचे भान वाढविते आहे. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. हे लक्षात घेता तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियांवर वृत्तपत्रातील लिखाण जेवढी खळबळ माजवतं तेवढी पुस्तकातील लिखाण माजवताना आढळत नाही. या मुळे ई –बुक आणि सोशल मीडियावर दमदार अभिव्यक्तीचे कोंब फुटताना दिसत आहेत लिहित्या लेखकांनी ही माध्यमे आपलीशी केली आहेत.

संदर्भ यादी
१.भारतातील प्रसारमाध्यमे काळ आणि आज,अनुवाद जयमती दळवी, डायमंड पब्लिकेशन पुणे प्रथमावृत्ती २००८.पृ १३६.
२.दिव्य मराठी रविवार ‘संवाद’ पुरवणी ११ सप्टेंबर २०१६,डॉ समाजमाध्यमे आणि लेखकाची जबाबदारी पृथ्वीराज तौर
३.दिव्य मराठी रविवार ‘संवाद’ पुरवणी ११ सप्टेंबर २०१६,डॉ समाजमाध्यमे आणि लेखकाची जबाबदारी पृथ्वीराज तौर
४.फेसबुक, मला जोडून असणाऱ्या व्यक्ती व मी फोलो करत असणाऱ्या व्यक्ती.
५.व्हाटसॲप, मला जोडून असणारे ग्रुप

कोकणातील लोककला : जाखडी नृत्य

लोकोस्तव म्हणजे लोकसंस्कृतीला श्रीमंत करणारा विधी होय . हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. कोकण परिसरात ही खूप मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे केले जातात. कोकणाचे आणि निसर्गाचे नाते अतूट आहे. सारा कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. निसर्गाबरोबरच लोककला या इथल्या जगण्याचा स्थायीभाव बनलेला आहे. डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत, सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलं. सह्याद्रीची जंगले, अभयारण्ये, नदया, धबधबे, नितांत सुंदर बॅकवॉटर्स, रुपेरी समुद्र किनारे, आंबा-काजू, नारळ, फोकळीच्या बागा, पुरातन मंदिरे, किल्ले, दुर्ग, हजारो वर्षापुर्वीची संस्कृती, समृध्द ग्रामजीवन लोककला या साऱ्यांनी कोकण बहरला आहे.
कोकणात भजन,शिमग्यातील खेळे, गणपतीतील जाखडी नृत्य, बैठकीचे गाणे, डफावरचे गाणे, अशा अनेक लोककला पाहायला मिळतात. त्यामुळे कोकणातील सण उत्सवांमध्ये एक वेगळीच लोकसंस्कृती पाहावयास मिळते. कोकणातील या कला व उत्सव येथील लोकांना परमेश्वराचे चिंतन व मनोरंजनाची ही महत्वाची साधने आहेत . त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी होय. या धार्मिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचा वारसा अव्याहतपणे त्यांनी सुरू ठेवला आहे. लोकांचे मनोरंजन हा ही या कलेमागील उद्देश असतो. या कलेच्या सादरीकरणामुळे समाजात आनंद व उत्सव पसरलेला असतो. ही परंपरा कोकणी माणसाने जोपासली आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालावा यासाठी अनेक शाहीर, भजन सम्राट, बुवा, कवि प्रयत्नशील आहेत.
कोकणातील एक लोकप्रिय कलाप्रकार म्हणजे जाखडी नृत्य होय. हा कलाप्रकार सर्वांचे निखळ मनोरंजन करतो.सोबतच परमेश्वर चिंतनही घडवतो. जाखडी नृत्य हे ‘नागेशवळी’ यांच्या पंथातून जन्मास आली. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. जाखडीचा नाच हा उभ्‍याने केला जातो, म्‍हणून त्‍यास ‘जाखडी’ असे म्‍हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो – ‘जखडणे’. ‘जाखडी’ मध्‍ये नृत्‍य करणार्‍यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्‍हटले जाते. मुंबईत ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्‍या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले. बाल्‍या अथवा जाखडी नृत्‍यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जाखडी नृत्यास लोकप्रियता मिळत आहे जाखडीला ‘बाल्या’, ‘जाखडणे’ किंवा ‘तंभुली नृत्य’ असेही म्हंटले जाते.यामध्ये शाहिरांमध्ये ज्याप्रकारे सवाल जवाब होत असतात त्याचप्रकारे जाखडीत सुध्दा दोन्ही बुवांचे सवाल जवाब होतात. या सवाल जवाब करणार्‍या दोन्ही शाहीरांना शक्ति-तुरा या नावांनी ओळखले जाते. शक्ती-तूरा म्हणजे शंकर-पार्वती व राधा- कृष्ण यांचा संवाद असतो. बुवा म्हणजे शाहीर. नृत्य’ या कलाप्रकाराचा उगम शाहिरी काव्य, तमाशा या लोककलांपासून सुरू झाला. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात.. बाल्या नाचाला कलगीतुरा किंवा शक्ती-तुर्‍याचा सामना असेही म्हणतात. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी ‘कलगी’ या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला ‘नागेशवळी’ म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी ‘तुरेवाले’ या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्‍हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्‍याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला. पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. त्या प्रकारच्या डफ-शाहिरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला. त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजे ‘बाल्या नृत्य’. बुवा जाखडी नृत्याच्या माध्यामातून प्रबोधन व निव्वळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
जाखडी नृत्य हे पूर्वीच्या काळापासून अस्तीवात आसणारा नृत्य प्रकार आहे . पूर्वी प्रत्येक गावाची एक जाखडी नृत्य असे स्वरूप होते. त्यावेळी गावातील स्त्री वगळता सर्वजण जाखडीत नाचत. याउलट चालू काळात जाखडी ही एका गावात तीन ते चार ठिकाणी सादर केली जाते.
गणेशोत्‍सवाच्‍या काळात जाखडी नृत्‍य व परंपरेला मोलाचे स्‍थान आहे. गणेशोत्‍सवात जाखडी पथके वाड्यावाड्यांतून बाल्‍या नृत्‍य सादर करताना दिसतात. चिपळूण तालुक्‍यातील अनारी, कुंभार्ली, पिंपळी, टेरव, कामथे, सावडे, गांग्रई, आंबडस अशा गावांतून जाखडी पथके आढळतात. राजापूर तालुक्यात मंडणगड, शिळ , उन्हाळे महाळुंगे , काशिर्गे व गुहागर, रोहा , दापोली, पडवन, खेड, संग्मेश्वर अशा अनेक गावात हि जाखडी पथके जाखडीचे सादरीकरण करताना दिसतात. हि जाखडी पथके नृत्‍य सादर करताना, शाहीर नैसर्गिक आपत्ती, तसेच समाजातील विविध समस्‍यांवर गीते रचतात. नृत्‍याच्‍या वेळी गीते गायली जातात. राधाकृष्‍णावर विशेष करून गाणी रचली जातात. वासुदेवाची गाणी, अथवा भारूडासारख्‍या लोकप्रकारांतून केली जाणारी जनजागृती जाखडी नृत्‍यातील गीतांतही दिसून येते. जाखडी नृत्‍यातील गीतांमध्‍ये ‘गणा धाव रे…’हे गीत विशेष प्रसिद्ध आहे.पूर्वीच्या काळात या खेळामध्ये प्रामुख्याने नाचासाठी ढोलकी, मृदुंग, घुंगरू, झांज, टाळ, बासरी, सनई , खुळखुळा, बासरी, टाळ, तबला, टिमकी, सुंदरी चकवी, बुलबुला संगीत वाजविण्यासाठी अशा प्रकारची पारंपारिक वाद्ये पूर्वीच्या काळी वापरली जात असे. बदलत्या काळानुसार आणखी काही नवीन इलेक्ट्रोनिक साहित्याचा वापर यामध्ये होवू लागला. ती म्हणजे कॅशिओ, ऑरगन ,पॅड, आणि प्रभावी ध्वनीसाठी विविध प्रकारचे माईक्स. जो केंद्रस्थानी गीत गाणारा (बुवा) असतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे माईक्स दिले जातात. त्याचबरोबर स्वर मिक्सरचा वापर केला जातो. आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी आवाज उपकरणांचा उपयोग केला जातो. बाला नृत्यप्रकारात एक-दोन गायक, एक ढोलकी किंवा मृदुंग वादक, एक शैलीवादक, एक-दोन झांजरीवादक व गायकांना साथ देणारे एक-दोन सुरते (कोरस देणारे) असतात. ते सर्वजण मधोमध बसतात आणि आठ ते दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार भरजरी कपडे व पायात चाळ बांधून पायांच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य करतात.
पूर्वीच्या काळी जाखडीत नाचण्यासाठी वीस ते पंचवीस लोकांचा समावेश असायचा त्यांचा पोशाख हाफ चड्डी किंवा शर्ट एवढाच असायचा आणि मध्यस्थानी एक साधा विजेचा दिवा असयाचा परंतु कालानुरूप यामध्ये बदल होत गेले बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. पूर्वी कासोटा बांधून नाच केला जात असे. त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले. त्‍यासोबत डोक्‍यावर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेला ही जाखडी नृत्‍याची वेशभूषा असे. हल्ली रंगेबेरंगी कपडे वापरले जातात.आणि सध्य स्थितीत जाखडीच्या पोशाखात बदल झाला आहे. तो खूप आकर्षक असा वापरला जातो. पायात घुंगुर, डोक्यात पगडा, हाताच्या मधल्या बोटाला मापक असा झगमगीत रुमाल बांधला जातो. चेहरा विशिष्ट प्रकारे सजवला जातो किंवा मुले किंवा मुली देव देवतांची किंवा राजा महाराजांची वेशभूषा करतात. तसेच प्रकाश योजनेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स वापरल्या जातात. लहान दिव्यांच्या लाईट्स, पोक्स, किंवा डिंमर,कलर, हॉलिजन यांचा प्रकाश ढोलकीच्या व नाचणार्‍या मुलांच्या अंगावर मारले जातात. त्यामुळे संपूर्ण वातावरण रंगीबेरंगी होवून जाते.
पूर्वीच्या काळात जास्तीत जास्त पुरुषच (२५ वर्षा पुढील ) गायन करत असे. सध्या मात्र यामध्ये बदल करून वयाची अट न ठेवता लहान मुले व महिलांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. जाखडी गायनाची कला अतिशय प्राभावी असते. जाखडीचे सादरीकरण करताना प्रथम शक्तीवाले त्यांचे नृत्य सादर करतात. त्यामध्ये ईशस्तवन केले जाते. नर्तक गुंफलेल्या नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करतात. त्यानंतर गण-गौळण, सवाल-जवाब, साकी, प्रतिस्पर्ध्याच्या चुका काढणारे, भक्तीपर, सामाजिक अथवा सद्यस्थितीसंबंधी माहितीपर गाणी गाऊन त्यावर नृत्य सादर केले जाते. गणात गणपतीला वंदन केले जाते, तर गौळणीत कृष्णाने गौळणींना केलेला इशारा गायला जातो. नृत्यामध्ये सवाल-जवाब स्वरूपाचीही गाणी गायली जातात. तुरेवाले त्यांचा सवाल विचारतात व शक्तीवाले त्यांच्या काव्यातून त्यांना उत्तर देतात.जाखडीमध्ये सुरुवात करताना जे गीत गायले जाते. त्या गीताला ‘गण’ असे म्हटले जाते. ‘ शिवतनया वक्रतुंड गौरीच्या रे बालका’ अशा गणपतीच्या गीताने ज्याप्रमाणे इतर शुभ कार्यक्रमाची सुरुवात होते अगदी तशीच सुरुवात जाखडीची होत असल्याने ती आद्य दैवत गणपतीच्या नामस्मरणाने होते.
जाखडीचा ‘डबलबारी’ हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये एक शाहीर शक्तीवाला तर एक तुरेवाला असतो. पूर्वी यापैकी जो अगोदर उपस्थित राहत त्याला बारी अगोदर करण्याची संधी दिली जात. सध्या मात्र शक्तीवाला शाहीर असतो त्यालाच आपली बारी सादर करण्याची संधि दिली जाते. डबलबारीसाठी जे गाणारे दोन्ही शाहीर असतात. या दोघांचे (कलगी, शक्ति, तुरा )ओळखपत्र असणे गरजेचे असते.ओळखपत्र नसेल तर त्यांना या खेळात सहभागी होता येत नाही. काळानुरूप तिचे स्वरूप बदलत गेले. यामध्ये शक्तिवाले बुवा पहिले आपले नृत्य किंवा गीत सादर करतात. तर दुसर्‍यावेळी तुरेवाले बुवा आपला कार्यक्रम सादर करतात. असे दोन वेळा होते. शक्तीवाले बुवा तुरेवाल्या बुवांना शास्त्राधारे प्रश्न विचारतात व तुरेवाले उत्तर देतात.
जेव्हा जाखडी सुरू होते तेव्हा शक्तीवाले शाहीर असतात ते स्वत:ची बारी सुरू करतात. जेव्हा सुत्रसंचलन करतात तेव्हा लेखी प्रश्नांची प्रत प्रतिस्पर्धी शाहिरांना देतात.ज्यावर प्रश्न व शाहिराची सही आणि नाव असते. तद नंतर पहिली तीन गाणी होतात ती म्हणजे गण, गौळण, पद अशा प्रकारची असतात. त्यापुढे जे प्रश्न असतात ते सर्वांसाठी म्हणजेच प्रेक्षकांना ही प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारण्याची पध्दत अशी असते.
प्रश्न :१. कला पथकाचे नाव काय.?, शाहीरचे नाव काय.? प्रेक्षकाकडुन प्रश्न आले असलयास प्रश्न व प्रश्न विचारणार्‍याचे नाव आणि सही असते. तसेच प्रश्न कोणत्या शाहिराला विचारला आहे याची टिप्पणीही असते. या प्रश्नांचे उत्तर ग्रंथाच्या आधारे असते.
बाल्या नृत्य श्रावणमास ते दिवाळी या काळात विशेष सादर केले जाते. जोडचाल, एक पावली, दोन पावली, तीन पावली आदी चालींवर जाखडी नृत्य केले जाते. नृत्‍य करणा-यांना बाल्‍या असे संबोधतात. उजव्या पायात भरपूर घुंगरू बांधले जातात. नृत्‍याची रचना प्रामुख्‍याने वर्तुळाकार असते. नृत्‍य करताना घुंगरू बाधलेल्‍या पायाने ठेका दिल्‍यामुळे ढोलकी, झांजरी, टाळेच्‍या आवाजात घुंगरांचा आवाज भर टाकतो. पायातले घुंगरू, गायकाचा उत्‍साहपूर्ण आवाज यामुळे नाचणा-यांच्‍या अंगी उत्‍साह संचारतो आणि ते गीत-वाद्यांच्‍या तालावर आरोळया देऊ लागतात. गाण्‍याच्‍या मधे ऐकू येणा-या त्‍या आरोळ्यांमुळे सादरीकरणात आणखी रंग भरला जातो. मात्र पायात घुंगरू बांधून नाच करणारे दुर्मीळ आहेत.
यामध्येच वेगवेगळ्या गाण्याच्या तालावर मुले मुली नाचतात. पाऊले मारतात, कोडी सोडवतात, रथ करतात. अशा प्रकारे हे नृत्य सादर केले जाते. डबलबारी या जा खडीच्या प्रकारात शक्तीवाला – तुरेवाला- शक्तीवाला – तुरेवाला अशा प्रकारे क्रमाक्रमाने एकमेकांना प्रश्नोत्तरे केली जातात. दोन्ही शाहीर जे एकमेकांना प्रश्न विचारतात ते पुराण रामायण, महाभारत, अशा पौराणिक ग्रंथातले असतात. यामुळे उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबर ज्ञानात भर हे प्रश्न घालत असतात. आणि प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात दोन्ही बुवांचे वाचन होत असते. या खेळातून मनोरंजनाबरोबर ज्ञान संपादनाचे कामही उत्कृष्टरित्या केले जाते. बाला नृत्यात गोफ नृत्याचाही समावेश आहे. या नृत्य-गीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा पौराणिक संदर्भ आहे. नाचणा-या बाल्‍यांचा वेशही कृष्‍णाप्रमाणे डोक्‍यावर मुकुट, दंड आणि मनगटावर बाजुबंद, गळ्यात माळा असा असतो.
गोफ नृत्‍याचे दक्षिणेकडील ‘पिनल कोलाट्टम्‌’ आणि गुजरातमधील ‘गोफगुंफन’ या नृत्यप्रकारांशी साधर्म्य आढळते.
गोफ नृत्‍यप्रकारात हातात गोफ घेतलेले बाल्‍या नृत्‍यासोबत गोफ विणत जातात आणि तेवढ्याच लकबीने तो सोडवतातही. गोफ नृत्‍यासाठी नर्तकांची संख्‍या समप्रमाणात असावी लागते. चार, सहा, आठ अशा संख्‍येने त्यांच्‍या जोड्या असतात. गोफ रंगेबेरंगी साड्या, ओढण्‍या अथवा कपड्यांपासून तयार केला जातो. नृत्‍य सादर करण्‍याच्‍या जागी, नर्तकांच्‍या शिरोभागी आढ्याच्‍या केंद्रस्‍थानी गोफ बांधून त्‍याची अनेक (नृत्‍य करणा-या व्‍यक्‍तींच्‍या संख्‍येएवढी) टोके अधांतरी सोडलेली असतात. प्रत्‍येक बाल्‍या एकेक टोक हाती घेतो. त्यानंतर गाण्‍याच्‍या तालावर आणि ढोलकीच्‍या ठेक्‍यावर नृत्‍य सुरू होते. काही वेळातच, बाल्‍या नृत्‍याची वर्तुळाकार गती सोडून परस्‍परांना सामोरे जाऊ लागतात आणि गोफाची गुंफण सुरू होते. त्यावेळी त्‍यांची नृत्‍याची पद्धत नागमोडी (झिगझॅग) वळणाची असते. अर्ध्‍या जोड्या डाव्‍या तर उर्वरित जोड्या उजव्‍या बाजूने प्रवास करत गोफ गुंफत असतात. गाण्‍याची रंगत जसजशी वाढत जाते तसतसा गोफ घट्ट विणला जात असतो. त्या वेळी ढोलकीच्‍या ठेक्‍यावरील पदन्‍यास, परस्‍परांसोबत असलेली सुसुत्रता यांचे फार महत्त्व असते. चुकलेल्‍या एका पदन्‍यासामुळेही गोफाची गुंफण बिघडू शकते. एका टप्‍प्‍यावर, गुंफण पूर्ण होते आणि बाल्‍या उत्‍साहाने नाचू लागतात. अनेकदा, गाण्‍याची चाल अथवा गाणे बदलले जाते. एखादे कडवे झाल्‍यानंतर गोफ सोडवण्‍याचा भाग सुरू होतो. त्या वेळी बाल्‍या विरूद्ध दिशेने परस्‍परांना सामोरे जाऊ लागतात आणि विणलेला गोफ तितक्याच लकबीने सोडवला जातो.
काही विभागांत विशिष्ट असे मनोरे उभारले जातात. रत्‍नागिरीमध्ये अड्डेरवाले हरी विठ्ठल नावाचे प्रसिद्ध शाहीर होऊन गेले. त्यांची जाखडी नाचाच्या कथेवरील पुस्तकेही प्रसिद्ध होती. पूर्वी केवळ कोकणात असणारे हे नृत्य शहरातही पाहण्याची संधी मिळते. ते नृत्य कोकणी माणसाबरोबर महाराष्ट्रातील सर्व भागांतील लोकांच्या पसंतीस पडले आहे.
शक्ति तुर्‍याच्या सामन्यात जी गीत गायली जातात ती ज्ञान देणारी असतात. गायलेल्या गीतांना चाल चित्रपटातील प्रसिध्द गीतांच्यावर आधारित असते. त्यामुळे प्रेक्षक आवडीने ऐकतात. जरी चाल चित्रपटाची असली तरी त्यातून दिली जाणारी माहिती ही पौराणिक ग्रंथातील असते.या खेळामध्ये सादर केली जाणारी गीते: पहिल्या बारीत तोडा म्हणजेच चित्रपट गीताच्या चालीवर गीत सादर करणे, स्तवन- प्रार्थना, गण-देवाचे नामस्मरन, गवळण- प्रेक्षकांना चिडवणे, राधा कृष्णाचे संवाद, प्रश्न, पद- शक्तीवाले आपल्या गीतातून सादर करतात ते गीत, तर दुसर्‍या बारीत टोमणा यात श्रेष्टत्वावरून लढाई चालते, समाजप्रबोधन गीत, उदा. मुलगा- मुलगी एक समान, सामाजिक गीत अशा प्रकारच्या गीतांचा समावेश केला जातो.त्यामध्ये गण-देवाचे नामस्मरन गणपतीच्या गीतांनी केली जाते त्यामध्येगणरायाची किर्ति माझ्या, जगाला आली दिसून
उंदरावर यावे बसून बाप्पा तुम्ही, तुम्ही उंदरावर यावे बसून
किंवा
सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्य त्र्यंबके गौरी, नारायने नमोस्तुते
अशा गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. तर या गीतानंतर बुवांच्या सवाल जवाबाची जुगलबंधी सुरू होते. राधा कृष्णाच्या नात्यातील वास्तव प्रेक्षकांसमोर गाण्यातून ठेवले जाते.
प्रीत तुझी अन माझी गं, राधे सार्‍या जगाला आली कळून
किंवा
मी गं श्रीहरी, वाढलो नंदाघरी खेळलो नानापरी,
होवू नको गं, राधा बावरी,तू होवू नको बावरी
राधाचे श्रीकृष्णावरचे प्रेम, लळा होता, पण आपले नाते पूर्ण होणार नाही हे ही गीतातूनच बुवा सांगतात.
प्रित तुझी न माझी आगळी गं राधे,
होणार नाही पुरी, गं राधे होणार नाही पुरी
अशा गीतातून दोन्ही बुवा एकाच बाजूचे दोन पैलू मांडताना दिसतात. कधीकधी या कार्यक्रमातून देशभक्तांना , शहिदांना श्रध्दांजली वाहिली जाते. तर एखाद्या प्रेक्षकांना गीत किंवा सवाल, जवाब आवडल्यास बुवांना बक्षिसे दिली जातात. जाखडीत प्रश्न किंवा सवाल जवाब होतात ते असे.
बुवाचा प्रश्न.दुर्गा देवीने दुर्गासुराला मारण्यासाठी जे दोन बाण मारले त्यातून नरौत्पत्ती झाली त्याची नावं काय. ? हा प्रश्न बुवा शाहिराला गाण्यातून विचारतो आणि गाण्यातूनच शाहीर त्याचे उत्तर देतो.
उत्तर : शाहीर म्हणतो तुझे वाचन आहे कमी, असा पुरावा पुराणात नाही दिला.
यानंतर शाहीर प्रश्न विचारतो व तुरेवाला बुवा उत्तर देतो.असे अनेक प्रश्नोत्तरे होतात. प्रश्नांच्या जुगलबंधित मनोरंजनासाठी एखादे चित्रापटातील गीत सादर केले जाते. तर कधी एकमेकांना अज्ञानी म्हणून चिडविले जाते. जाखडीच्या शेवटी गीत म्हटले जाते त्याला ‘गजर’ असे म्हंटले जाते. हे गीत ही देवाच्या नावाचेच असते. अशा प्रकारे कोकणातील लोककलेतील मनोरंजनाची एक कला जाखडी कोकणात सर्वत्र सादर केली जाते.
सध्‍या जाखडी नृत्याचे आधुनिकीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. नृत्याच्या गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा वापर वाढला असून नृत्याची परंपरा चुकीच्या मार्गावर नेली जात आहे असे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. नृत्‍यामध्‍ये ईश्‍वराचे स्‍मरण आणि भावनिकता यांना स्‍थान होते. त्या जागी जाखडीमध्‍ये सिनेमाच्‍या गाण्‍यांच्‍या तालावर गीते गायली जातात. त्‍याचबरोबर गाण्‍यातून एकमेकांशी अर्वाच्‍य भाषेत बोलणे, अश्‍लील गाणी म्‍हणणे, आकर्षणासाठी नृत्‍यात कसरती करणे, अंगावर विद्युत उपकरणे लावणे, डोंबा-याचे खेळ करत नाचणे, अशा अनेक प्रकारांनी या लोककलेत शिरकाव केला आहे. जाखडी नृत्याच्‍या दृकश्राव्‍य सीडी बाजारात येत आहेत. त्‍यातही चांगल्‍या गीतांसोबत थिल्‍लर स्‍वरूपाची गीते पाहण्‍यास-ऐकण्‍यास मिळत आहेत.
जाखडी लोककलेमधील अश्‍लीलता दूर व्‍हावी आणि या लोककलेचा पूर्वीचा बाज कायम रहावा यासाठी काही संस्‍था प्रयत्‍नशील असल्‍याचे दिसते. चिपळूण तालुक्‍यात रत्‍नाकर दळवी यांच्‍याकडून दरवर्षी जाखडी नृत्‍याच्‍या स्‍पर्धा भरवण्‍यात येतात.यामध्ये शक्तीवाले वृन्दाली दळवी, मंडणगड, संतोष कणेरे उन्हाळे, कविता निकम खेड, संदेश दुदम संगमेश्वर , तेजल पवार साखरपा , कृष्ण नागरेकर, शिळ, सत्यवान कार्शिगकर, कार्शिंगे तर तुरेवाले शाहीर वसंत भोयर चिपळूण, रामचंद्र गांकर पडवन, देवेंद्र झिमण लांजा, प्रभाकर चोळकर दापोली या सारखे अनेक शाहीर (बुवा ) या स्पर्धेत सहभागी होतात. या सारख्या स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित केल्या जातात. या स्‍पर्धांना प्रतिसाद मिळत असून, स्‍पर्धा जिंकणे हे जाखडी नृत्‍य मंडळांच्‍या दृष्‍टीने मानाचे समजले जाते. कोकणात अशा काही स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात येते.
सद्या गणेशोत्‍सवात जाखडी नृत्‍याचा प्रभाव कमी झाला असल्‍याचे निरीक्षण वर्तमानपत्रांतून नोंदवण्‍यात आले आहे. हल्ली जाखडीत अश्लीलता आलेली दिसते. जाखडीचे निवेदन करत असताना दोन्ही बुवांच्या तोंडातून अनेक अश्लील शब्द , ओंगाळवाणे चित्रण होताना दिसते. जाखडीच्या उगमापासून आतापर्यंत तिच्या सादरीकरणात काळानुसार जाखडी नृत्त्यात बदल होत गेला असूनही इतर कलांप्रमाणे कोकणात ही कला आजही जोपासली जाते. या कलेद्वारे समाजप्रबोधनाचे व मनोरंजनाचे उत्कृष्ट कार्य होताना दिसत आहे. प्रा. बाळासो सुतार
आबासाहेब मराठे महाविद्यालय
राजापूर
मो ९७३०८९१४२८
इमेल bala.sutar@gmail.com

गावागाड्याचा बदलता अवकाश

खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण या खाऊजा च्या परिणामाने जगाबरोबरच भारतातही खूप उलथापालथ झालेली दिसून येते. पारंपरिक स्वरुपाची कुटुंब आणि गावपद्धती एकदम कालबाह्य ठरली. खरेदी विक्रीच्या ऑनलाइन पद्धती या आमच्या जगण्याचा आविभाज्य भाग झाल्या आहेत खाण्यापिण्याचे, मनोरंजन आणि अन्य स्वरूपाचे सारे रीतीरीवाजही बदलले. तंत्रज्ञान वेगानं आलं. डेस्कटॉपकडे नवलाईनं पाहणारी माणसं बघता बघता इंटरनेट, मोबाईल वापरू लागली. गुगल, युट्यूब आणि एकूणच इंटरनेट हे माहितीची आणि ज्ञानाची नवी माध्यमे आपल्या हातात आली. सीसीटीव्ही, मोबाईल कॅमेरा आणि या स्वरूपाच्या अन्य साधनांनी कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. यातून संपत जाणारी ‘प्रायव्हसी’ खरेच या अर्थाने आता आपण ग्लोबल व्हिलेजचे गावकरी झालो आहोत. जगायच्या नव्या पद्धती अंगी बानवून शहराप्रमाणे निमशहरी भागातही या सगळ्या बदलाचे पडसाद उमटलेले दिसतात.
काळाच्या स्थित्यंतराचे बिनचूक आकलन असलेले व समकालीन काळाचे सहप्रवासी बालाजी सुतार कवी-लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी नियतकालिकांतून मोजक्या परंतु अभिजात अशा कथा लिहून कथाकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेली आहे. त्यांच्या कथा-कवितांचा ‘गावकथा’ हा रंगाविष्कारही गावाची वास्तव मांडणी करतो आहे. त्यांचा‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा आठ कथांचा पहिलाच कथासंग्रह आजच्या मराठी कथेला नवे वळण देण्याची क्षमता बाळगून असलेला समृध्द करणारा आणि समकालीन कथा संग्रह आहे. एकंदरित बालाजी सुतार हे आजच्या लिहित्या लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव आहे . त्यांच्या या आजच्या कथेबद्दल राजन गवस यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्यानुसार लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वतःचा मोकळा अवकाश करून देणाऱ्या आजच्या कथाकारांमध्ये बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’. ‘१९९० ते २०१५ या पावशतकास’ ही कथासंग्रहाची अपर्णपत्रिका बरीच बोलकी, आणि सूचक आहे. नव्वद नंतरचा काळ हा आपल्या देशातल्या एका नव्या पर्वाच्या आरंभाचा आहे. या कथासंग्रहात ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’, ‘डहूळ डोहातले भोवरे’, ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’, ‘दोन जगातला कवी’, ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’, ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’, ‘संधिकाळातले जहरी प्रहर’ आणि ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ अशा एकूण सात कथा १५९ पानांमध्ये व्यापलेल्या आहेत. या आठ कथा अतिशय वेगवेगळे विषय कौशल्यानं हाताळणार्‍या आणि तरीही एका धाग्यात बांधता येतील अशा, माणसांचं आजचं आयुष्य व बदलत्या काळातील बदलती नाती या समकाळाच्या कसोटीवर तपासणार्‍या आहेत. या कथासंग्रहाला मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘कथाकार शांताराम पुरस्कार’ जाहीर झाला आहे, ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा बालाजी सुतार यांचा शब्द पब्लिकेशने या वर्षी प्रकाशित झालेला संग्रह. याच वर्षी त्याची दुसरी आवृत्ती निघाली ही बाब खास नोंद घ्यावी अशी होय. या कथा आजच्या डोळस लेखकाच्या आहेत.
जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाल्यावर खेडेगावांमध्ये जीवनमान कसे बदलत गेले, तिथली जातीव्यवस्था कुठल्या वळणावर येऊन ठेपली आहे. शतकानुशतके काबाडकष्टातच जगणारी महिला, साभोवतालची व्यवस्था आज कोणत्या अवस्थेत आहे. जाती-पातींच्या आड माणूस म्हणून दडलेले राक्षसी चेहरे, तरुणाईची स्वप्ने कोणती आहेत. ती कशाने भंगत आहेत. गावांमध्ये धार्मिक तेढ म्हणजे नेमके काय असते, अशा विविध धागादोऱ्यांचा अतिशय बळकट पोत बालाजी सुतार यांची लेखणी अतिशय मर्मभेदी पद्धतीने विणते.
गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावागाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. कृषी संस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड व बदलता गावागाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरीत्या बालाजी सुतार आविष्कृत करताना दिसतात. बदलत्या गावागाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. समकालीन शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात पसरते आहे. शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती असताना ही कथा नव्या भवतालाकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी देते. लोकमानसामध्ये घडलेल्या पालटामुले कृषी संस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला गेलेले तडे व उपयोगितावादी, व्यवहारी, जीवनदृष्टी या बदलाचे व त्यातील ताणाचे चित्रण बालाजी सुतारांची कथा करते.
‘विछिन्न भोवतालाचे संदर्भ’ ही पहिलीच कथा ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन हे शहर आहे की, स्मशान ? असा प्रश्न विचारत जगण्यात बैचेन झालेल्या माणसांच्या व्यथांचे खंडित, तुटलेले वास्तव मांडते. राघव नावाच्या एका तरुणाची शब्दांत टिपलेली आत्मसंवेदना आहे. राघवला बिनकामाचा निवांतपणा आहे आणि त्या निवांतपणाचे काय करायचं हा प्रश्न पड्तो. राघव रोजच्या आयुष्यात काही अर्थ शोधू पाहतो. एका कम्प्युटर सेंटरवर नोकरी करणारा, फारसं काही न घडणारं आयुष्य, त्यातली काही माणसांच्या आतल्या दु:खाशी आपलं दु:ख उगीचच ताडून पाहणारा. समकाळाविषयी भाष्य करणारी ही कथा आहे. “सतत येणाऱ्या बधीर कंटाळ्याचे काय करावे, हे त्याला उमगत नाही हीच त्याची गोची आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यावर लेखक लिहितात, ‘कल्पितांना कथा समजून वाचण्यात फार दिवस व्यर्थ गेले. जिवंत गाथा वाचायच्याच राहून गेल्या. सव्यापसव्यं यांत्रिक असतात आणि डोहातली उसळीच फक्त जिती असते, हे भडव्या कधी उमजणार तुलाॽ पारा उडून आणि गंध विरून गेल्यावरॽ’. या दोन प्रसंगांमध्ये त्यांचा हा सवाल प्रत्येक शब्दांवर अनेक अंतरंगे उलगडत वचकाला थक्क करून टाकतो. पुढे ते आणखी एका संदर्भात म्हणतात, ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन. हे शहर आहे की स्मशानॽ’, ‘मायेचा पाऊस असला तर माणसाच्या शिवारात ओल राहते. पाऊस नाही, धान मरून जातं. पाऊस नाही, मन जळून जातं. पाऊस नाही, तहानेनं वाळून जा. पाऊस ओढ देतो, चातक होऊन बस. पाऊस झड लावतो, अगस्ती होऊन उपस. पावसात रोमँटिक कविता लिहिणं ठीक आहे. पावसात खमंग भजी तळून खाणंही ठीकच. पावसा अभावी काही पिकं, काही शेतं, काही घरं, काही गावं आणि कितीएक शंकर मरून जातात हे लक्षात असू दे.’ असे चिरफारळलेला, भेगाळलेला भवतालाचे चित्र उभे करतात तेव्हा वाचकाच्या काळजाचा थरकाप उडतो. समकाळाच्या माणसाच्या जगण्यातील संदर्भांचा मागोवा घेते, जगण्यातले ताणे-बाणे, विछिन्न भोवतालाचे संदर्भ कथा उदगोचर करते.
‘डहूळ डोहातले भोवरे’ ही कथा हरिश्चंद्र शेकाटेच्या मनातील डहूळला डोहातील पडलेल्या प्रश्नांची गुंतवळ या कथेत उमटवून जाते. मानसिक-शारिरिक गुलामीच्या बळी ठरलेल्या, अडलेल्याचा फायदा घेणार्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रवृत्तीचा ही कथा वेध घेणारी आहे. नवऱ्याच्या कर्जबाजारीपणाच्या विळख्यामुळे सावकाराची लैगिंक शिकार आपल्याला व्हावं लागेल, या जाणिवेने शांतरामच्या मेव्हणीने रोगर पिऊन केलेली आत्महत्या, या बाईच्या आत्महत्येनंतर हरिश्चंद्र आपलं हतबल आयुष्य तपासून पाहतो. व आपण एका विचित्र परिस्थितीतून जात आहे याचे भान त्याला येते. “राख झाल्या चितेचे तपशील शोधण्यात नंतर काय हशील होतं?” हा प्रश्न सतावत असताना तो आपल्या परीनं एक उपाय काढू पाहतो. दुसरीकडे हरिश्चंद्र शेकाटे या नायकाच्या पत्नीला, नवरा कामावर गेला की ज्याच्यामुळे त्याला नोकरी लागली, त्या मामेभावासोबत संग करायला भाग पाडणारी हतबलता, असा मूल्यात्मक संघर्ष या कथेत शांताराम, व्यंकटी या पात्रांच्या व सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर -पुरुष नातेसंबंधांच्या घुसमटीचा एकसमयावेच्छेदक आढावा ही कथा घेते. स्त्री-पुरुषांच्या भावभावना, कामप्रेरणा, त्यातून निर्माण होणारे ताण, त्यात होरपळणाऱ्या जीवांची घालमेल व घुसमट ‘डहूळ डोहातले भोवरे’ ही कथा दर्शवते.
‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाउन्स’ या कथेतून कवी, लेखक किंवा प्रतिभावंत असणारी समाजमान्य-राजमान्य माणसं समाजमाध्यमांवर वेगळी व त्याच माध्यमाच्या इनबॉक्समध्ये अत्यंत वेगळी वागतात. प्रकारच्या अदृश्य जगाचा अनुभव व्यक्त झाला आहे. जगाशी जोडून घेता येण्यासाठी आज बहुसंख्य लोक समाजमाध्यमांवर वावरत असतात, त्यामुळे त्यांना आपली भूमिका आपली ओळख निर्माण करता आली, हे जरी खरं असलं तरी, त्या समाजमाध्यमांची दुसरी बाजू ही अत्यंत वेगळी नि विरुद्ध म्हणावी अशी आहे. या आभासी जगाने आपल्याला व्यक्त होण्याचा अतिआत्मविश्वास दिला, तसाच व्यक्तिगत जगण्यावर हल्लाही केला आहे. अनेक कुटुंबं उध्वस्त केली आहेत. आपल्या विवेकाला, मूल्यांना हादरा दिला आहे, हे विसरून चालणार नाही. हे चित्र लेखक’निळ्या चमकदार काळोखातले अप-डाउन्स’ या कथेतूनचित्रित करतो. चित्रा, सर्जेराव,मोहन या पात्राआधारे माध्यमातील सध्यकालीन तरुण तरुनींची अवस्था ते चित्रित करतात. सोशल मीडिया, त्यातलं आभासी जग आणि तिथली फसवी-तात्पुरती नाती वस्तुस्थितीचे दर्शन ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’ही कथा करते. जग तांत्रिकदृष्ट्या कितीही विस्तारले, सामाजिक समतेचे अवकाश जरी मोकळे झाले असले तरी“स्रीचं जीवशास्रीय ‘मादी’असणं आणि पुरूषातला‘नर’उफाळून येणं”या स्री-पुरूष आदिम हा विषय अलीकडे अनेक कथाकारांना खुणावत असतो. त्यातला फोलपणा ते आपल्या पद्धतीनं शोधत असतात. त्या प्रकारची संग्रहातली कथा ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’. कम्प्युटरच्या निळसर चमकदार पडद्यामागचं जग निवेदिकेच्या आयुष्यात एक हलचल माजवून जाते. थोड्या काळापुरती. स्त्री-पुरुष नात्यांचा आदिम अर्थ कायम तोच असतो का, याचा निर्देश त्यात आहे. पण एक सर्वसामान्य स्त्री हेही शांतपणे पचवून पुढे जाते, हे विशेष लक्षात घेण्यासारखं.
‘दोन जगातला कवी’ ही कथा एका कवीच्या साहित्य आणि वास्तवाच्या चटकयांचाही निर्देश ही कथा करते. एका संवेदनशील कवीचं जग या कथेतून आलेलं आहे. कवीचं गाव, गावातील कृषिवल लोकसमूह, त्यांची लहरी निसर्गावर आधारित जीवनपद्धती, त्यावर उमटलेले जागतिकीकरणाचे तीव्र पडसाद, आतबट्यात आलेली शेती आणि तरीही त्यांचे विलक्षण रागलोभ, तसेच त्या समूहातील भाव-भावकीत असणारे वैमनस्य व त्यातून एकमेकांचे नुकसान करणारी विकृत मानसिकता, ह्या सर्वांचे चित्रण या कथेत चित्रित होते. साहित्यिक आणि शेती अशा दोन्ही जगात वावरणार्या व्यक्तीच्या मानसिक संघर्षाचे सत्यान्वयी दर्शन‘ दोन जगातला कवी’ या कथेतून घडते. लेखक, कवी हे काही समाजातील अविभाज्य भाग आहेत. समाजात वावरताना घडणाऱ्या अनेक घटना-घटितांचा ते आपल्या साहित्यातून वेध घेतात. एक प्रतिमासृष्टी ते निर्माण करून आपल्या सूक्ष्म दृष्टीने ते समष्टीकडे पाहतात. अशाच कविच्या जगण्यातील तारेवरील कसरत व त्याचा भोवताल लेखक या कथेत चित्रित करतात
‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’ या कथेतून शिक्षित, पण अडाणी बेरोजगारांची आणि त्यानं निर्माण केलेले उच्चशिक्षितांचे चमत्कारिक प्रश्न ही कथा उजागर करते. ग्रामीण-शहरी जीवनरीतीतील ताण आणि खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्था,तीमधील संस्थाचालकांची सरंजामी वर्तवणूक ,त्यात अनुदानाच्या अपेक्षेने गुलामासारखी राबणारी तरूणाई,त्यात त्यांचे हुरूळून गेलेले भौतिक-अभौतिक स्वप्ने-ईच्छा-आकांक्षा यासह आजच्या तरूणाच्या जैविक-अजैविक पराभवाचा नकाशा साकारतो. जागतिकीकरणाच्या नंतर शिक्षणाला आलेले बाजारू स्वरूप, शैक्षणिक संस्थाचे संचालकांना आलेले संस्थानिक-सरंजामदारी स्वरूप, शिक्षण संस्थांचे फुटलेले पेव, शिक्षणक्षेत्रातला बजबजाट, उद्धवस्त झालेली गुणवत्ता,उद्ध्वस्त झालेली बेरोजगार पीढ़ी व त्यांचे आजचं वास्तव, ही कथा चित्रित करते. पैशांचं साधन बनलेल्या शिक्षणसंस्था आणि स्पर्धा परीक्षा केंद्रं हे धर्म, जातीयता, पैसा, सत्तेच्या अमर्याद वापराखाली भरडले जात कसल्याही कामाला जुंपलेले शिक्षक-प्राध्यापक, स्त्री-पुरुष संबंधांमध्ये एकीकडे येत चाललेला मोकळेपणा, पण दुसरीकडे न टाळता येणारं गावकुसातलं पारंपरिक आयुष्य अशा पार्श्वभूमीवर निवेदकाची पराभूत आणि भ्रमनिरास झालेली स्थिती विलक्षण विदारकतेनं ‘पराभवच्या बखरीतली काही पानं’ या कथेतून समोरं येतं. तालुका किंवा निमशहरी पातळीवर शिकून चांगली नोकरी करून कुटुंबाला वर काढण्याच्या उद्देशानं कष्ट करून घेतलेलं शिक्षण आणि त्याची प्रत्यक्षातली किंमत हे प्रखरप्रखर वास्तव बालाजी सुतार कथेत मुखर करतात
‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ही कथा मागील पंचवीस वर्षातील स्थित्यंतरात्मक घटीतांना मुखरीत करते. समाज जेवढा अनागोंदीचा, तेवढा लेखकांसाठी विषयांचा, आशयांचा पुरवठा मुबलक. मराठी समाज सर्वच बाबींत एवढय़ा प्रमाणात भंगलेला आहे की, लेखकांना लिहिण्याच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक व आवाहनात्मक आहे. हिंदू-मुस्लिम संघर्षातून निर्माण झालेला धार्मिक उन्माद, पाणी आणि मूल्यहीन राजकारणाने घडवलेला भवताल, शेतकर्यांच्या आत्महत्येचा तीव्र बनत गेलेला प्रश्न, आरक्षणातून निर्माण झालेले पेच अशा या काळाला भारीत करणार्या मराठी समाज आजच्या मराठी लेखकांना विषय पुरवण्याच्या दृष्टीने अत्त्युच्च टोकावर आहे. आज आपण अधिकच आधुनिक झालो आहोत, पण आपल्यातला धर्म-जात-वंश यांचा वृथा अभिमान काही केल्या आपल्याला सोडता वा टाळता आलेला नाही. उलट आपण त्याला खूपच चिकटून बसलो. आपल्या अस्मिता अधिकच टोकदार करत गेलो. गेल्या पंचवीस वर्षांतील आपल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय अवस्थांतराचा हा वेधच ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेतून बालाजी सुतार यांनी खूप सशक्तपणे घेतलेला आहे एकीकडे सामाजिक प्रश्नांचा गुंता वाढत असतानाच पर्यावरचा ऱ्हास व पाण्याच्या वैश्विक प्रश्नावरही खूप मर्मभेदक भाष्य त्यांनी केले आहे. आपल्या एकूण सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीवरचे त्यांचे चिंतनशील भाष्य त्यांनी या कथांतून फार परखडपणे मांडले आहे. १९९२च्या दंगली. त्यात बिलालचा संदर्भ. मग पुढे २००८मध्ये पाण्याच्या प्रश्नावरचं राजकारण आणि गावपातळीवरचं समाजकारण. नंतर २०१३मध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागचं अर्थकारण, आणि २०१७मधली हलवून टाकणारी टिपणं. रूढार्थानं कथा नसलेल्या या नोंदी एका संवेदनशील मनानं टिपलेल्या आहेत. जागतिकीकरणाने, जगण्याच्या स्पर्धेने गावांचे, शहरांचे बदललेले रूप बालाजी सुतार पोटतिड्कीने मांडताना दिसतात.
वर्तमानाचे अध:पतित वास्तव म्हणून ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’ ही कथा उजागर होते. या कथेत तालुक्याचा गाव आहे. त्यात जातीय तेड आहे. तिथल्या करीमनगर वस्तीतली अनुबाई ही उद्योगी स्त्री करीमभाईच्या पोरग्याला धरून आहे. दारिद्रयाच्या हतबलतेतून स्रीने धनाढ्याशी अनैतिक शरिरसंबंध ठेवत मुकाट्याने आपला संसाराचा गाडा हाकत राहणे, राजकीय डावपेचाच भाग म्हणून वरचड ठरू पाहणार्याचा खून होणे, त्याच्या आरोपात गरीबाला गोवले जाणे,त्यातून हिंदू-मुस्लीम असा अस्मितावादी राजकारणाचा खेळ खेळत समूहा-समूहात वैरभाव निर्माण करत स्वत:चा स्वार्थ साधणे या वृत्तीचे संवेदन या कथेतून चित्रित होते. कथेला वस्तीतल्या अनेक गोष्टींचे पदर आहेत. या पोराचा मृत्यूनंतर आणि तिच्या निष्क्रिय नवर्‍याच्या मृत्यूनंतर वस्तीपलीकडील जगाची व पुरुषाची नजर ओळखून राहणारी अनुबाई पुन्हा पुन्हा त्याच नजरेच्या परिघात येत राहते. नगरपरिषदेच्या अभद्र राजकारणामुळे शहरात वसणार्या अनाधिकृत झोपडपट्या, त्यातील बकालपण,’संधिकाळातले जहरी प्रसंग’ही या संग्रहातील शेवटची कथा दिवसेंदिवस जगणे निस्तेज होऊन नासत चालल्याची जाणीव प्रभावीरित्या व्यक्त झाली आहे.
खेड्यापाड्यात घुसलेल्या नव्या वृत्ती-प्रवृत्ती, राजकारणाने घेतलेले नवे वळण, गावाचे ढासळतेपण, तरुणांची बदलेली मानसिकता, स्त्रियांच्या जगण्यातील गुंतागुंत, नात्यात निर्माण झालेले ताण, जातीच्या टोकाचा अभिमानाचे, अहंकाराचे तीक्ष्ण झालेले कंगोरे या कथेच्या केंद्रभागी आहे. एकीकडे सामाजिक प्रश्नांचा गुंता वाढत असतानाच समस्यात भरडून निघणाऱ्या व्यक्तींच्या मनाची आंदोलने अत्यंत बारकाव्याने लेखकाने दृष्य व प्रत्ययकारी केली आहेत. भिन्न भिन्न व्यक्तिमत्त्वांतील परस्परांना छेदणारे विरोधी भावदर्शन आणि प्रसंगदर्शन यामुळे समस्यांची तीव्रता घुसत जाते. पर्यावरचा ऱ्हास व पाण्याच्या वैश्विक प्रश्नावरही खूप मर्मभेदक भाष्य बलजी सुतार करतात. आपल्या एकूण सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीवरचे त्यांचे चिंतनशील भाष्य नागर व अनागर अशा दोन्ही समाजजीवनातील, बदलांचा, त्यांच्या सुरूप-कुरूप वृत्ती-प्रवृत्तीचा खूप विस्तृत व व्यापक आढावा त्यांनी या कथांतून फार परखडपणे घेतला आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षण, अनुभवांची व्यामिश्रता, काय सांगायचे याचे आणि कथात्मकतेला असणारा ठाम निर्धार, त्यामुळे नव्या कथात्म-साहित्याची सुरुवात या कथासंग्रहात दिसून येतो.
या कथासंग्रहाची भाषाशैली व मराठी कथेतील या कथेचे स्थान सांगताना “आजच्या विछिन्न अर्धनागर जगाची बखर” या लेखात केदार काळवणे लिहितात “आजच्या विदीर्ण जगाच्या जीवनरहाटीचा भोवंडून टाकणारा मूल्यात्मक आशय आणि आशयाच्या तीव्र दाबातून साकारलेला चिरेबंद भाषिक रूपबंध हा या कथेचा मूलभूत विशेष आहे.कथागाभा विशद करणारी प्रतिकात्म कथाशीर्षके,आशयार्थाचे सरळ सूचन करणारी कथासुरूवात आणि कथारचितात रिकाम्या जागा ठेवत वाचकांना तपशील भरायला लावणारे अस्वस्थकारी कथाशेवट,विचारसंपृक्त सुविचारमय निवेदनपध्दती, शब्द-वाक्यांची काटेकोर रेखीव बांधणी,कथारचनेची प्रयोगशील परंतु अर्थसंगत कुतूहलपर मांडणी, चित्रात्मक-फोटोग्राफीक कथनशैली, कथा जोडणीत काव्य-संवाद व उपरोधाचा साधलेला अटीव मिश्रसंयोग,ढबदार मराठवाडी हिंदी-मराठी बोलभाषा आणि प्रमाणभाषेचे सफाईदार उपयोजन, छोटे-छोटे प्रसंगतुकडे आणि घटना समूहांची घट्ट वीण या सार्यांच्या सप्रमाण एकतेतून या कथाघाटाची बांधणी झालेली आहे.हा रूपबंधाचा ढाचा रूढ मराठी लघुकथेचा साचा मोडत नव्या कथनमार्गाची पायवाट निर्मिणारा आहे.” या संग्रहातील आठ कथामधून निवेदनाच्या बाबतीत कथेच्या आशयाला धक्का लागू न देता प्रयोगशीलता केली गेली आहे. पाच कथा प्रथमपुरुषी निवेदनातून साकारलेल्या असून उर्वरित तीन कथा या तृतीयपुरुषी निवेदनात आहेत. कथांच्या अनेकपदरी अवकाशातून समाजव्यवस्थेचे तळकोपरे ते या निवेदनातून मुखर करतात. कथांमधील वर्णनात्मक शैली, निवेदन, संवाद, बोलीभाषा व तिचा प्रादेशिक बाज यांचा त्यांनी कल्पकतेने वापर केला आहे. लोकपरंपरेने चालत आलेली संस्कृतिक रुपतत्त्वे त्यांच्या लेखनात आढळतात.
शिकलेल्या तरुणांची शिक्षण, नोकरी, पैसा प्राप्त करण्याची प्रवृत्ती व धडपड, गावाचे होत असलेले शहरीकरण या ज्वलंत समस्यावर ते परखडपने बोलतात. भौतिक बदलांमुळे नागर अनागर रचनेतील सत्तासंबंधापासून ते मानवी मानसिक रचनेपर्यंतचे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, बदल कसे घडत गेले हे त्यांनी संवेदनक्षम मनाने टिपलेले आहे. कथेच्या प्रभावी जाणीवविश्वाबरोबरच कलात्मक रुपाला स्वायत्त स्थान देणारी कथारुपे बालाजी सुतार यांच्या लिखाणातून प्रकटतात व वाचकांना समृद्ध करतात.संदर्भ टीपा
१ बालाजी सुतार, ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’,शब्द प्रकाशन, प्रथमावृती २०१९.
२ केदार काळवणे, ‘आपलं महानगर’, आजच्या विछिन्न अर्धनागर जगाची बखर.

हव्यास

टोकाचा हव्यास

दुसऱ्याला नागव करून स्वतः नटनारी प्रवृत्ती जन्माला येतेय

स्वतःच्या भातावर डाळ ओढण्याची स्पर्धा लागलीय

माणसाला वस्तू बनवन्याच्या काळात

पलीकडील झोपडीतील माणसाची झोपडी हरवतेय

बंगल्याच्या हव्यास असणाऱ्या पालिकडील शेजाऱ्याला

हा न संपणारा हव्यास

जगण्यात मोठे होण्याच्या मार्गात

कोणत्याही थराला जाणारा स्वार्थानंद

माणसाचे यंत्र

यंत्राने खाल्लेला माणूस
हतबल होऊन कचऱ्यात पडलाय
स्वतःच डिलीट ऑप्शन वापरल्यासारखा
स्क्रीनमध्ये अडकलाय तो
मोबाईल पीसी लॅपटॉप अनेक रंगबेरंगी
स्वतःच अस्तिव गुंतवून
त्याने करून घेतलाय बद्दल यंत्रासारखाच स्वतःत
भावना विचार याचे नाते जोडून घेतलीय
माणूस हद्दपार केलाय स्वतातून
आजूबाजूच्या यंत्रात सामावून घेतले स्वतःला

डायरीतील पाने

आज खूप खूप अस्वस्थ खुळ्याच्या काळजीने मन सैरावैरा धावत होते. दिवसभर तहानभूक हरवली होती. मनाची घालमेल होत होती. कुणीतरी माझ्या काळजावर आगीचा धगधगता निखारा ठेवल्यासारखे वाटत होतं. माझी अशी अवस्था झाली असेल तर कोणासमोर काहीच बोलत नसनाऱ्या पुरुषांचे काय, असे इकडून तिकडे करत असेल असेल आज सकाळी तरी आनंदी जगण्यासाठी काय करावे याचा विचार करत होते मग आनंद द्विगुणित करायचा असेल तर खरोखरच दुसऱ्या सोबत संवाद साधलाच हवा

मग मी सकाळी सकाळी तुला फोन केला. शुभप्रभात गुड मॉर्निंग असं म्हणून दिवसाची सुरुवात केली. खूप आनंदी वाटलं. आवाज ऐकून खूप छान वाटलं. पण हल्ली मी फार कमी वेळ देतो या गोतावळ्यातून आज पण वेळ दिला नाही पण हे योग्य नाही. तुला मी सारखा शब्द देतो पण मागचेच पुढे. तुझी ताडफड मात्र.

मग तू पाऊस होशील आणि मला चिंब भिजवशील

मग तू वीज होशील आणि मिठीत घट्ट घेशील

हातामध्ये जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपया भाकरीसाठी खर्च करा आणि एक रुपया फुलासाठी भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल व फुल तुम्हाला कसं जगायचं ते नक्कीच शिकवेल. मी फुलावर देण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम करेल सर्वांना मलाही लवकर नाही जमलं तरी हळूहळू करण्याचा प्रयत्न करेन पण नक्की सुधारेल आणि स्वतःला आणि सर्वांचा आयुष्य सुध्दा उडवुन टाकेन सगळ्यांना म्हणजे कोणाला मला मी रोमँटिक सुद्धा जगतो हे आपण विसरून जातो

पुण्याला जाताना

नेटची परीक्षा रात्रीच्या सुनसान खामोशीत आयुष्याच्या नव्या वाटेवर नव्या देहाचे हर्षभरीत तांडव नृत्य. तृप्ततेच्या हजार छटा शरीराच्या प्रत्येक पेशी गणित आंदोलित राहिल्या. सप्तपदीच्या प्रत्येक पदाची अखंड शपथ रात्रभर तळमळत राहिली. प्रत्येक क्षेत्राच्या गुंतागुंतीत आनंदाचे वारू चौफेर फिरू लागले. चकवाचांदण रात्रभर फिरू लागलं. कधी मदमस्त देहावर तर कधी सैरावरा मनावर तर कधी उजाड भविष्यावर लख्ख प्रकाशत जाणार सहअस्तित्व क्षणभर भास की वास्तव असा काठोकाठ भरलेला संभ्रम. रात्रीची अभेद्य सोबत आणि पहाटेचा पुणेरी गंधवारा सारं कसं गंधर्व नगरीचा सहवास वाटावा असेच बोटातील बोटांचा गुंता हातातील मिलनाची चाहूल रस्त्या रस्त्यावरून ह्रदयाची हृदयाला हाक हा सारा अनुभवच नवचैतन्याने उभारलेला. परतीचे वारे सारे हरवून टाकणारे भविष्याच्या मांडीवरिल झोपेतून अस्मानी चा भास. मात्र या परतीच्या प्रवासा ने अश्रूंच्या महापुरात नाहून टाकलं. आनंदाला थांबवून ठेवलं. सार विश्वच तिथच पिंगा घालतय असा आभास. हे दिवस अखंड टिको.